शंकर - पार्वतीची गोष्ट : . …… : दैव देते अन कर्म नेते !
एकदा शंकर - पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करायची म्हणून आपले वाहन नंदीला घेवून निघाले . शंकर महादेव भगवान आपल्याच ध्याना च्या तंद्री मध्ये मग्न होते . पार्वती देवी कुतूहलाने इकडे - तिकडे सगळीकडे नजर फिरवत होती व हि पृथ्वी आपल्या महादेवाने किती सुंदर बनवली आहे हे पाहत होती . नंदी विमान ( वाहन ) आकाशातून भ्रमण करत होते . पृथ्वी वरील नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या नद्या , हिरवीगार वनराई , त्यात विविध रंगाचे फुले , नाजूक कळ्या , त्यावर भ्रमर करीत असलेले विहार , मधूनच त्या फुलांचा येत असलेला सुंगंध , विविध पक्षांचा किलबिलाट , गोजिरवाणे हरीणे , पार्वती माता अगदी तन्मयतेने हे सर्व पाहण्यात हरखून गेली होती .
विमान असेच पुढे चालले होते , एका सुनसान रस्त्यावरून एक मानव प्राणी उमा मातेला एकटाच रस्त्याने दिसला . तो आपल्याच तंद्रीत चालला होता . मधूनच काहीतरी विचित्र हावभाव करायचे , डोक्याला हात लावायचा , कुठे पायाने दगडांना लाथाडायचा . उमा मातेला हे सगळे विचित्र वाटले , त्या मानवाने उमा मातेला विचारात पाडले होते , हि दुनिया किती सुंदर , उल्हासदायी , प्रसन्न व नित्य नवी नूतन वाटत आहे आणि हा प्राणी असा का वागतोय ह्याचे मातेला खूप आश्चर्य वाटले . पार्वती मातेने त्याच्या मनात चाललेल्या घालमेलीचा अंदाज घेतला तेंव्हा उमा मातेला कळून आले कि हि मानव प्राणी दारिद्र्याने गांजलेला आहे , स्वताच्या परिस्थितीला तो दोष देत आहे , आपल्याशी का सगळेच असे वागत आहेत ह्या मुळे तो स्वतालाच दोषी समजत आहे , माझी लायकी असून हि लायकी नसलेले ( नालायक ) लोक आपल्या पुढे जातायत व आपण तसेच मागे राहत आहोत अशी त्याची मन धारणा झालेली होती , आपल्या कडे पुष्कळ धन असेल तर ह्या धनाने आपण किती सुखी व आनंदात राहिलो असतो ह्याचे तो तर्क करत होता . आपले बायका मुले हि आपले ऐकत नाहीत , मी किती कर्म अभागी आहे असे मनातल्या मनात पुटपुटत तो एकटाच स्वताच्या दैवाला दोष देत चालला होता .
उमा मातेला त्याचे हे दुख जाणून खूप वाईट वाटले , त्याची हि अवस्था उमा मातेच्या हि मनाला लागून गेली , माता विचार करू लागली आपल्या महादेवाने इतकी चांगली सृष्टीची निर्मिती केली आहे मग हा अन्याय ह्या भोळ्या - भाबड्या मानव प्राण्यावर ह्या देवादी देवाने का केलाय ? हा अन्याय आहे ? ह्या मानवाला आपण न्याय मिळवून दिलाच पाहिजे .
उमा मातेने , महादेवाना तात्काळ विमान अंतराळात थांबवायला सांगितले व शंकर देवाला ध्यानाच्या तंद्रीत तून हलवून जागे केले .
उमा माता महादेवाला म्हणाल्या " स्वामी , आपण सर्व सृष्टीचे कुशल - मंगल पाहता मग ह्या मानव प्राण्याची व्यथा तुम्हाला कळत कशी नाही ? तुम्हाला कळाली कशी नाही ? "
महादेवाने अर्धवट डोळे उघडून उत्तर दिले " उमा , तू ह्या मानावा कडे लक्ष्य देवू नकोस , अन्य काही पृथ्वीचे नयन मनोहर स्थळे आहेत ती तू बघ "
उमा मातेला हि तिचा अपमान वाटला , त्या उसळून म्हणाल्या " देवा , तुम्ही माझा मनोभंग करताय ? "
तापलेले वातावरण महादेवाच्या लक्षात आले व देव सबुरीने बोलले " हे उमा देवी - मानव प्राणी हा असाच आहे तू तिकडे लक्ष देवू नकोस "
झाले , जे व्हायला नको तेच झाले , महादेव ऐकत नाहीत म्हणून नेहमी प्रमाणे उमा माता लगेच रुसल्या ,
म्हणाल्या " नाही , त्या मानवा वर दया करा …. त्याला संधी द्या …. त्याचातही योग्यता आहे "
महादेवाने उमा माता रुसल्या मुळे कपाळाला हात लावला . तरीही हि सबुरीने बोलले " अग , उमे रुसू नको , फुगू नको , हा सृष्टी नियम आहे … तुला त्या मानवाच्या खोडी माहित नाहीत , तू ऐक , चल आपण पुढे जावूयात "
उमा माता तर आता चिडल्याच " त्या मानव प्राण्याचे तुम्ही हित करा , नाही तर मी तुमच्याशी अबोल धरणार व इथून हलणार हि नाही "
उमा मातेचा हट्टीपणा व अबोला महादेवाना नवीन नव्हता . तिचा रुद्रावतार हि त्यांना चांगलाच माहित होता , परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेवून देवाने थोडे नमते घेतले व म्हणाले " हे उमे , हा मानव कर्म-भ्रष्ट आहे , आळशी आहे , ह्याची दुसऱ्याच्या पैशावर आशा आहे , हा नीतीने वागत नाही , हा लालची आहे , ह्याला विना कष्ट सर्व काही पाहिजे आहे , ह्याला झटपट श्रीमंत व्हायचे आहे , हा स्वताच्या मुला बाळांची हि हेळसांड करतोय , हा आई वडिलांना हि माघारी / उलटे बोलतोय , हा थोर मोठ्यांचा चार चौघात पाणउतारा करतोय , हा अनेक दोषाने भरलेला आहे ."
उमा मातेने डोळ्यानेच वटारून पहिले व नाक - ओठ फिस्कारत आपली नापसंती व्यक्त केली .
महादेवाचाही नाविलाज झाला म्हणाले " उमे , स्वत मला सुद्धा ह्या सृष्टीच्या नियमनात फेरफार , फेरबदल करण्याचा अधिकार नाही , हे देवी , भूतला वरिल प्रत्येक गोष्ट हि पूर्व कर्माने बाधित असते , परंतु तू हट्ट धरला आहेस तर बघ , हा मानव प्राणी किती खोडील आहे व कसा आपल्या बचावासाठी अनेक करणे शोधीत असतो .
उमा माता तिरक्या नजरेने अजून हि देवाकडे पाहताच होत्या .
महादेव म्हणाले " उमा , तुझ्या समाधानासाठी मी त्या मानवाचे हित करण्याचा प्रयत्न करतो परंतु तू बघशीलच तो मानव त्या लायकीचा नाही .
त्या मानवाचे कल्याण होणार ह्या विचाराने उमा माता मनातल्या मनात आनंदित झाल्या .
इकडे तो मानव प्राणी आपल्याच स्थितीला दोष देत असाच चालला होता , तो ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्यावर महादेवाने उमा मातेला सांगून एक अमुल्य रत्न , सोने , हिरे माणके ,ह्यांनी भरलेली थैली ठेवली व उमा मातेला खुणावले कि बघ आता ……
पुढे रस्ता सरळ दिसत होता व खड्डे खुद्डे हि काही नव्हते . आधीच तो माणूस नाकाम . नाकर्ता होता , त्यातच त्याला विपरीत बुद्धी सुचली . त्याला वाटले ह्या सरळ रस्त्यावरून आपण किती लांब डोळे बंद करून जावू शकतो ते बघुयात .त्याने डोळे बंद केले व तो चालू लागला …. चालता चालता धनाने भरलेली थैली जवळ आली , तरीही तो डोळे बंद करूनच चालला …. खूप अंतर तो चालून गेला व धनाची थैली मागेच राहिली
दैवाने आले होते परंतु कर्माने घालवले .
इकडे उमाचा चेहरा पाहण्या सारखा झाला होता . उमा मातेच्या खांद्यावर हात ठेवत महादेव म्हणाले " देवी उमे , कुठल्याही जीवाचे अस्तित्व हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते . तुला ज्या मानवाचा कळवला आला आहे त्यात त्याच्या पूर्वकर्मा चा वाटा खूप आहे , हाच मानव जर सुरुवाती पासून सतत कार्यरत राहिला असता दुसर्याच्या धनाकडे लोभाने , दुसऱ्यांच्या पत्नी / मुलाकडे असूयेने , दुसऱ्या वर टीका टिपणी करत बसला नसता तर हि वेळ त्याच्यावर आली नसती . प्रत्येकाचे आयुष्य हे असेच कालचक्रात कर्मगती मुळे बद्ध झालेले आहे व त्यामुळेच ते संतुलित हि झालेले आहे . ह्या विश्वाचा जरी मी निर्माता असलो तरी मी निमित्त मात्र आहे हि संपूर्ण सृष्टी हि कर्माधीन आहे . मानवाने सतत कर्म करत राहावे , कर्म करत राहिल्याने मनात दुसरे कुठलेही अविचार हि येत नाहीत व दुखदायक परिस्थिती हि ओढवत नाही . उमा , तू ज्या ह्या मानवासाठी चिंता करत होतीस , तसा तो हि वाईट नाही ,…. पुढे जावून त्याला कर्माचे महत्व कळणार आहे , स्वाभिमान व स्वावलंबन ह्याची त्याला जाणीव झाली कि तो स्वत आपल्याला कार्यात गुंतवून घेणार आहे , तू काळजी करू नकोस , मी त्यचे सुयश चिंतितो "
महादेवाच्या ह्या आश्वासक उतर|णे उमा माते चे हि समाधान झाले व te प्रसन्न मनाने पुढे विमानाने पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले.
बंधुनो , कहाणी संपली ह्या कहाणी तून मला एवढेच सांगायचे आहे सतत कर्म करत राहून ते कार्य करत असताना आलेल्या संधीचे सोने करायला पाहिजे , बऱ्याचशा प्रमाणात कर्म दरिद्रा मी पण आहे , परंतु काय करणार ? म्हणून हि कथा माझ्या कायम स्मरणात राहिलेली आहे , ती मी माझ्या पद्धतीने खुलवण्याचा प्रयत्न केला आहे . मी कथा सांगण्यात खूप कच्चा आहे हे मला माहित आहे परंतु आपण मला नेहमीच समजून घेत आला आहात आता हि घ्याल अशी अपेक्षा .
ह्याच धर्तीवर एक आंधळ्याची गोष्ट सांगितली जाते , एक आंधळा एका गावात रात्री अडकलेला असतो , गावाच्या सभोवताली एक दगडी भिंतिची तटबंदी असते व तो आंधळा भिंतीच्या कडे कडेने जायचा व प्रवेशद्वार आले कि त्याच्या मनात आपण हात सोडून किती लांब चालतो हा विचार यायचा व तो पर्यंत प्रवेशद्वार मागे व हा पुढे असा प्रकार सतत चालू राहायचा .
आपण आपल्या आयुष्यात आलेलि संधी कधीही सोडता कामा नये , नेमक्या वेळी मनाचे खेळ करण्यात व आंधळे बहिरे होण्यात काही मजा नाही . त्या संधीवर अनेक जन डोळा ठेवून असतात अथवा काहीजणांना ती आपसूकच विशेष कष्ट न करताच प्राप्त होत असते .
आपल्या वडार समाज बांधवाना कर्म , कष्ट , मेहनत ह्या शिवाय पर्याय नाही , सोबत मनात अनेक विषय नकोत , अंधश्रद्धा नकोत , व्यसने नकोत , जुगार नको . एक चांगला समाज घडवण्यासाठी ज्ञानार्थी व्हायला हवे ., सध्याच्या प्राप्त परिस्थितीत आपल्या समाजाला हौस मौज परवडणारी नाही , साध्या राहणीतून आपण समाजाला खूप चांगला संदेश देवू शकतो .
आपला समाज आता बराच सुधारला आहे परंतु अजून बऱ्याच समाज बांधवाना सोबत घ्यायचे आहे . आपण सुधारलो म्हणून मस्ती करून चालणार नाही , आपले बालपण , आपल्या वडिलांनी सोसलेल्या हाल अपेष्टा …. हे आपण कधीही विसरता कामा नये
जय बजरंग ……. जय वडार ! ! !
( ..पृथ्वी प्रदक्षिणा करत पुढे काही अंतर गेल्या नंतर उमा मातेने शंकर देवाला प्रश्न केला " स्वामी , परंतु जे अधिक इमानदार व कष्टाळू असतात त्यांचे आयुष्य कसे काय असते ? " शंकर भगवान उतरले " हे उमा , जे इमानदार व कष्टाळू असतात त्यांच्या मध्ये कधी हाव , मत्सर , द्वेष भावना , तिरस्कार , लोभ व आळस हे गुण नसतात , त्यांना संकटे जरी आली तरी ते डगमगत नाहीत , आपल्या सचोटीने , सात्विक पणाने , आत्मविश्वासावर , आपण दिलेल्या शब्दावर ते कायम असतात . ह्यांना आपत्ती , संकटे , विघ्ने आली तरी हे त्यांचा धैर्याने सामना करतात . भविष्याचा अंदाज घेवून हे लोक साधे पणाने व शिस्तीने आपले आयुष्य जगात असतात . म्हणून हे उमा देवी इमानदार व कष्टाळू लोक हे खूप समजदार , उदार व दुसर्यांना सतत मदत करणारे असतात , हे सच्चे असल्यामुळे हे कुठल्या गोष्टीला भीत नाहीत त्यामुळे हे लोक छोट्याशा गोष्टीत हि समाधानाने राहतात , आनंद मानून घेतात व दुसर्यांना हि आनद देतत. अशा लोकांच्या वर विश्वास ठेवणारे लोक हि खूप असतात . हे उमे , कधी कधी ह्या लोकांना त्यांच्या इमानदारीचे व कष्टाचे चीज झाले नाही असा संभ्रम निर्माण होतो , परंतु जे लोक आपली सचोटी , आपल्या मेहनती वरील विश्वास कायम ठेवतात व सतत कार्यरत राहतात अन्य प्रलोभने , व्यसने , वाईट संगती ह्या पासून दूर राहतात त्यांच्याकडे सतत लक्ष्मी( पैसा ) , सरस्वती ( विद्या , संगीत आदि कला ) ह्या देवता सदा वास करत असतात त्यामुळे हे भू - लोकात व परलोकात हि श्रेष्ठ आहेत "
भगवान शंकरांच्या ह्या उत्तराने माता पार्वतीचे समाधान झाले व ते पुढे विमानाने कैलासाला निघून गेले. )
No comments:
Post a Comment